पाली, कर्जत, खालापूर : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला बुधवारी (दि. 29) गारांसह मुसळधार पाऊस व वादळाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.
सुधागड तालुक्यातील पाछापूर विभागा असलेल्या पाश्चापूर, पंचशीलनागर, दर्यागाव आसानेवाडी आदी गावांत अनेक घरांचे पत्रे व कौले फुटून नुकसान झाले आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली. अन्य भागांतही पावसाच्या सरी कोसळून नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने कसे जगावे ही चिंता सर्वसामान्यांना भेडसावत असताना नैसर्गिक आपत्तीनेही डोके वर काढले. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशातच बाजारपेठा बंद असल्याने आवश्यक साहित्य मिळणार कसे? छप्पर हरपल्याने साठवण करून ठेवलेले धान्य व जीवनावश्यक साहित्य भिजून गेल्यास खावे काय? असे प्रश्न नुकसानग्रस्त नागरिकांना सतावत आहेत. प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीची दखल घेऊन नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper