नवी मुंबई : बातमीदार – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलकरिता आमदार निधीतून खास बाब म्हणून पाच अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन केली आहे.
प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असताना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याकरिता पालिकेच्या अॅम्ब्युलन्स कमी पडत आहेत. अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे विनाकारण हाल होत आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता अॅम्ब्युलन्सची संख्या वाढविणे गरजेचे आहे. तर बधितांवर तातडीने उपचार करणे व रुग्णालयात पोहोचवणे शक्य होऊन जीव वाचवता येणार आहे. त्यामुळे आमदार निधीतून सर्व सुविधांयुक्त पाच रुग्णवाहिका नवी मुंबई महानगरपालिकेला द्याव्यात, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र पाठवून केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper