माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील लाखपाले गावच्या हद्दीत वॅगनर कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या साईडपट्टीवरून उलटली. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 18) सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अपघाताची फिर्याद मयताचा मुलगा संतोष जयराम भुरटे (वय 43, रा. भांडूप, ठाणे, मूळ रा. चिराली ता. खेड) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. अपघाताबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भांडूप (ठाणे) येथून चिराली (ता. खेड) या ठिकाणी निघालेली वॅगनर कार (एमएच 02-बीडी 6149) माणगावपासून 13 किमी अंतरावर असलेल्या लाखपाले गावाच्या हद्दीत आल्यावर चालकाचा ताबा वाहनावरील सुटला आणि ही कार साईडपट्टीवरून उलटली.
या अपघातात जयराम भागोजी भुरटे (वय 75, रा. भांडूप, ठाणे, मूळ गाव चिराली ता. खेड) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा फिर्यादी संतोष जयराम भुरटे हा जखमी झाला. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, निरीक्षक अनिल टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक एन. सी. रसाळ अधिक तपास करीत आहेत.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper