Breaking News

कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे टीकास्त्र

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरातील कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. लॉकडाऊनला आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले, मात्र आज 55 दिवस होऊनदेखील कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोडले आहे.
पनवेल परिसरातून मुंबईला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अनेक जण जातात. त्यापैकी काहींना कोरोना झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत असल्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पनवेल तालुक्यातून मुंबईत जाऊन सेवा देणार्‍या सेवाकर्मींची कोरोना संकट संपेपर्यंत राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. तसे झाले नाही तर 4 मेपासून मेडिकल वगळता इतर सेवा बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, मुंबई महानगरपालिका आपल्या कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले होते. त्यानुसार 2 मे रोजी आदेश निघाला, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्ध्यांच्या मृत्यूनंतर नकाश्रू  ढाळण्यापेक्षा जिवंतपणी त्यांना वाचवण्याची उपाययोजना काय? त्यांना पुरेसे साहित्य उपलब्ध करून देणार की नाही? असे सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी थेट शासनाला विचारले आहेत. अनेक राज्यांतील सरकारे फक्त केंद्रावर अवलंबून न राहता स्वतः विविध गोष्टींची पूर्तता करीत आहेत. आपण केंद्राने काय दिले आणि नाही दिले या पलिकडे स्वत: काही करणार आहात का, असाही प्रश्न त्यांनी आघाडी सरकारला उद्देशून उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडत असल्याचे स्पष्ट चित्र दिसतंय आणि ही धोक्याची घंटा आहे, अशा शब्दांत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री कोविड वॉरिअर्सचे तोंडी कौतुक करतात, पण त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण कसे करणार यावर उपाययोजना काय? याचे मला आणि माझ्या पनवेलच्या जनतेला तातडीने उत्तर द्यावे, अशी मागणीही आमदार ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply