मुंबई : प्रतिनिधी
जून महिना सरत आला की मुंबई आणि उपनगरांमध्ये ‘बजरंग बली की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’ अशा आरोळ्या ठोकत मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला सुरुवात होते, मात्र यंदा कोरोनाच्या साथीमुळे परिस्थिती अगदी वेगळी आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समन्वय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
दहीहंडी उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणारे आणि तो बघणारे अशी प्रचंड गर्दी होते. आता गर्दी होणे योग्य नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करू नये, असे आवाहन मुंबईतील गोविंदा पथकांना करण्यात आले आहे. पथकांनी स्थानिक पातळीवर सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत जन्माष्टमीची पूजा करावी, असे दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे कार्याध्यक्ष आणि माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदा पथकाचे (ताडवाडी) प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सांगितले.
बचेंगे तो और भी खेलेंगे!
सर सलामत तो पगडी पचास किंवा बचेंगे तो और भी लडेंगे/खेलेंगे असे म्हणत दहीहंडी उत्सव पुढील वर्षी जोमाने व जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो आणि कोरोनाची महामारी लवकरात लवकर दूर होवो, अशी प्रार्थनाही समितीने जारी केलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.
Check Also
राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper