रोहे : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या समन्वयकांनी रविवारी (दि. 16) रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अत्याचारात बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची दुसर्यांदा भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांनी या घटनेत न्याय मिळवून देण्यासाठी समस्त मराठा समाज एकवटला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी; अन्यथा येत्या अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राज्य सरकारला दिला.
तांबडी बुद्रुक येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश डोंगरे, महेश राणे, युवराज सूर्यवंशी, राजन घाग, रमेश कोरे-पाटील, राजू घुळे, विवेक सावंत, रूपाली निंबाळकर आदी महाराष्ट्रातील पदाधिकारी आले होते. मराठा समाज समन्वयक व स्थानिक ग्रामस्थांची बैठक येथील मंदिरात झाली. या वेळी राजन घाग म्हणाले की, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी सरकारने योग्य ती उपाययोजना करावी. आम्हाला सामाजिक अशांतता नको आहे, परंतु आमचा अंत पाहू नका. मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, मराठा मूक मोर्चा या समाजाच्या संघटना एकत्र आल्या आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्याकडे पुन्हा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
रमेश कोरे-पाटील यांनी कोपर्डी, हिंगणघाट व आता तांबडी येथे अत्याचाराची घटना घडली. आम्हाला न्याय पाहिजे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार व प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या घटनेचा तपास करा. 26 तारखेच्या आत आरोपींविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. नाहीतर मराठा समाजाचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महेश डोंगरे म्हणाले की, मराठा समाज शांतताप्रिय आहे. आम्ही तांबडी अत्याचारप्रकरणी गृहमंत्र्यांना भेटलो. आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावा. त्याचप्रमाणे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना तातडीने संरक्षण मिळावे.
रूपाली निंबाळकर यांनी तांबडी बुद्रुक येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून राज्यात स्त्रिया, मुली सुरक्षित नसल्याचे म्हटले, तर महेश राणे यांनी आजही या गावातील ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. महिला बाहेर निघू शकत नाहीत. हे वातावरण दूर करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने लवकरच मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper