मुरूड : प्रतिनिधी : हिंदी राजभाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारचे पोत परिवहन मंत्रालय आणि दीपस्तंभ व दीपपोत निदेशालय (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान व हिंदी निंबंध लेखन स्पर्धेत यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले आहे.
या सामान्य ज्ञान व हिंदी निंबंध लेखन स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या इयत्ता सातवी ते नववी आणि अकरावीच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हिंदी निंबंध लेखन प्रतियोगितेसाठी मेरा प्रिय शिक्षक, प्रिय खेल, सर्जिकल स्ट्राईक व स्वच्छ भारत अभियान असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या स्मिता मधुकर वाडकर, साक्षी पाके, रिया तरे (इयत्ता सातवी), अथर्व कवळे, निधी बिरवाडकर, अभिषेक जोशी (इयत्ता आठवी), ऋतिका राऊत, पार्थ ठाकूर, सुजल पाटील (इयत्ता नववी), तसेच प्रीतम कुंरोटकर, अविराज तांबोळी आणि सत्यविजय शेडगे (इयत्ता अकरावी) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाच्या प्रास्ताविकात अनुवादक तृप्तीराणी सुमाल यांनी हिंदी भाषेविषयी माहिती दिली. दीपस्तंभ व दीपपोत निदेशालयाचे निदेशक आर. एम. पटेल, मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांची या वेळी समयोचित भाषणे झाली.
दीपस्तंभ व दीपपोत निदेशालयाचे उपनिदेशक डी. एस. जठार, शाळेचे उपपर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, सहाय्यक लेखापाल वंदना सवाणे, आयटी प्रचालक राजेंद्र बुक्कावार, वीणा नागवेकर, राजेश मडाव, सुरेंद्र मामठीवार, आशीष यादव, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रेय खुळपे, राहील घलटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper