Breaking News

‘देशाला पुरावा हवा की वीरपुत्र?’

मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

मेरठ ः वृत्तसंस्था : जमीन, आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत चौकीदार सरकारने केली, असे सांगत एअर स्ट्राइकचा पुरावा मागणार्‍यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केला. देशाला पुरावा हवा की वीरपुत्र, अशी विचारणा त्यांनी या वेळी केली. नरेंद्र मोदींनी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या वेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी बोलताना त्यांनी जी कामे केली त्याचा हिशेब देणार आणि विरोधकांना जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही अपयशी का राहिलात, हा प्रश्नही विचारणार असल्याचे सांगितले.

एकीकडे चौकीदार तर दुसरीकडे रागदारांची रांग आहे, असे सांगताना एकीकडे भारताचे संस्कार तर दुसरीकडे वंशवाद, भ्रष्टाचार आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेससहित विरोधकांवर केली. या वेळी नरेंद्र मोदींनी मिशन शक्तीसंबंधीही भाष्य केले. अवकाशातही आम्ही आपली ताकद दाखवली आहे, असे सांगताना त्यांनी टीका करणार्‍या राहुल गांधी आणि विरोधकांना टोला लगावला. राहुल गांधी यांना ए-सॅट म्हणजे रंगभूमीवरील सेट वाटला. आता त्यांच्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. त्यांची कीव येते, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदींनी या वेळी बोलताना आपल्या सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. 34 कोटी गरिबांसाठी बँक खाती सुरू केली. 12 कोटी शेतकर्‍यांना 75 कोटींची मदत केली. गुंडागर्दी, दहशतवादापासून सुरक्षा देण्याचे काम आमच्या सरकारने केले. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शनचे आश्वासन आम्ही पूर्ण केले. घोषणाबाजी करणारी सरकारे फार पाहिली, पण ठोस निर्णय घेण्याचे काम आमच्या सरकारने केले, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

राहुल गांधींनी घोषणा केलेल्या न्याय स्कीमवरही नरेंद्र मोदींनी टीका केली. जे खाते सुरू करू शकले नाहीत ते त्यात पैसे काय टाकणार, असा टोला त्यांनी लगावला. नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा महाआघाडीचा उल्लेख ‘महामिलावट सरकार’ करीत त्यांच्या हाती सत्ता आली तर देश पुन्हा भूतकाळात जाईल, असे सांगत देश त्यांच्या हाती सुरक्षित राहील का, असा सवाल विचारला.

चौकीदाराला आव्हान देणारे आता रडत फिरत आहेत. मोदींनी दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना का मारले, असे विचारत आहेत. पाकिस्तानात कोण हीरो होणार याची विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यांच्या नावे पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जात आहेत, अशी टीका करताना आपल्याला देशातील हीरो हवे आहेत की पाकिस्तानचे, असा सवालही त्यांनी विचारला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply