20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट
मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार
देशभरात 15 ऑक्टोबरपर्यंत बर्यापैकी पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषत: देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात पावसाची हजेरी कायम राहणार असून, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणास ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने गुरुवारी (दि. 17) पुढील चार आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे. पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात मध्य भारतासह दक्षिण भागात पावसाचा जोर कायम राहील. सरासरीच्या तुलनेएवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस या काळात कोसळेल. त्यानंतरच्या तिसर्या आणि चौथ्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी होणार असला तरी याबाबतची अद्ययावत माहिती पुन्हा जारी केली जाणार आहे. गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली असतानाच 18 आणि 19 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे, तर 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper