Breaking News

कोरोना चाचण्या वाढवा; अन्यथा रुग्ण आणि मृत्यू वाढतील!

आरोग्य मंत्रालयाचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. याचे गंभीर परिणाम होऊन कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, तेलंगणा आदी अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येतात. जास्तीत जास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्यांचा जीवही वाचू शकतो. महाराष्ट्रात 10 लाख लोकांमागे सरकारी 42 हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात कोरोना पॉझिटिव्ह दर हा 21.5 टक्के आहे. आम्ही गेल्या आठवड्यात 10 लाख लोकांमागे रोज सरासरी किती चाचण्या केल्या जातात याची माहिती घेतली असता, रोज सरासरी 377 चाचण्या केल्या जात असल्याचे दिसून आले असून, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे एका महिन्यात सरासरी जास्तीत जास्त रोज किती चाचण्या झाल्या याची माहिती घेतली असता, 10 लाख लोकांमागे 583 चाचण्या घेण्यात आल्या असून, यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर हा 26.9 टक्के होता.
कोरोनासाठी अ‍ॅन्टिजेन चाचण्या करण्यामागे तत्काळ रुग्ण शोध घेणे, लागण झालेल्या विभागात तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्या तत्काळ तपासणीसाठी ही चाचणी योग्य असली तरी लक्षणे असलेल्या व अ‍ॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे अपर सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे अ‍ॅन्टिजेन चाचणीसाठी स्वॅब घेतानाच दोन स्वॅब घ्यावे जेणेकरून काही शंका आल्यास आरटीपीसीआर चाचणीही करता येईल व रुग्णाला पुन्हा चाचणीसाठी यावे लागणार नाही. दुर्दैवाने त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रात होताना दिसत नाही.
महाराष्ट्रात 539 कोरोना चाचणी प्रयोगशाळा असून, यापैकी 218 प्रयोगशाळेत 100पेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. या प्रयोगशाळांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जावा. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमणे त्यांच्या शिफ्टपासून योग्य व्यवस्थापन करण्यासही सांगण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply