Breaking News

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे आंदोलन  

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करीत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उत्तर रायगड महिला मोर्चातर्फेही सोमवारी (दि. 12) पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करून तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, जिल्हा चिटणीस चारुशीला घरत, उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस दर्शना भोईर, मृणाल खेडकर, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, उरण तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष वनिता विजय पाटील, कामोठे अध्यक्ष वनिता दिलीप पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष सुजाता दळवी, कर्जत तालुकाध्यक्ष सरस्वती चौधरी, पनवेल मनपा महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, सीता पाटील, रूचिता लोंढे, हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेविका नीता माळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील तसेच समिना साठी, बिना गोगरी, सपना पाटील, सुनीता गुरव, राखी पिंपळे, जयश्री धापटे, रसिका शेट्ये, सुनीता महर्षी, स्नेहल सावंत, अश्विनी अत्रे, सुरेखा गांधी, अमरिश मोकल, रवींद्र नाईक, अमर उपाध्याय आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात महिला, मुलींवर अत्याचार्‍या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना महामारीच्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिला, तरुणींवरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाने याचे गांभीर्य ओळखून या घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलीस ठाण्याला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनांबद्दल निवेदन पाठविले, मात्र या निवेदनाचे व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा प्रतिसाद देण्याची शिष्टाईदेखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने प्रशासनदेखील महिला अत्याचाराच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्समध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एकदिवसीय आंदोलन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यामध्येही पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात महिलेवर झालेला अत्याचार असो की कोन येथील इंडिया बुल्स कोविड विलगीकरण केंद्रात उपचार घेत असलेल्या महिलेवर झालेला अतिप्रसंग तसेच रोहा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या व अशा अनेक घटना घडत आहेत, मात्र तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्याने राज्य सरकारला जागे करण्यासाठी आणि समस्त महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात वाचा फोडण्यासाठी पुन्हा सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply