भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टीका; मुख्यमंत्री ठाकरे यांना अभ्यास करण्याचा सल्ला
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिल्यानंतर लॉकडाऊन नको असा सूर उमटताना दिसत आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. कोरोना काळात राज्य सरकारला आलेले अपयश हे मुख्यमंत्र्यांनी या वेळी ही राज्यातील जनतेवरच फोडले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांना अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पुण्यात लागू करण्यात आलेला मिनी लॉकडाउन आणि राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत टीका केली आहे. कोरोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने आपले अपयश लपवण्यासाठी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन लावला तर आपले अपयश झाकता येईल, असे या लबाड सरकारला वाटते. पण या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या सर्वसामान्य जनतेचे काय होणार? याचा विचार आधी या सरकारने करायला हवा, असे पाटील म्हणाले.
पहिल्या लॉकडाऊनमधून सावरत सावरत आता कुठे सर्वसामान्य जनतेचे जीवन रुळावर येत होते, परंतु आता या सरकारच्या मूर्खपणामुळे पुन्हा एकदा गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणार्या या लबाड सरकारने पुन्हा लॉकडाऊन करताना जनता जुमानत नसल्याचे कारण देऊन या वेळी जनतेवरच आपल्या अपयशाचे खापर फोडले आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
ठाकरे सरकारने कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आणि कोरोनाचे निर्बंध जसे की सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे इत्यादी नियम आणखी कडक करायला हवे होते. कारण हा लॉकडाऊन गोरगरीब जनतेला परवडण्यासारखा नाही. या सरकारला जर लॉकडाऊन लावायचाच असेल, तर त्यांनी आधी हातावर पोट असणार्या गोरगरीब जनतेच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा. जगात जिथे जिथे पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात आले, तिथल्या सरकारने त्यांच्या जनतेच्या मदतीसाठी भरघोस पॅकेजदेखील आधी पोहचवले होते. उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा!, असा सल्ला पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.