उरण : वार्ताहर
जासई गावच्या 270 शेतकर्यांना सिडकोकडून भूमी संपादनाच्या नोटीसा आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी बुधवारी (दि. 14) सकाळी 11.30 वाजता डेप्युटी कलेक्टर तथा भूसंपादन अधिकारी अश्विनी पाटील यांच्या कार्यालयात शेतकर्यांवर होणार्या अन्यायाविरुद्ध प्रश्न उपस्थित केले. पहिल्या मागण्या पूर्ण करा, तरच भूमी संपादन करा, असा नारा देत शेतकर्यांनी सिडकोविरोधात आंदोलन केले.
या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली 270 शेतकरी, माजी सभापती नरेश घरत, यशवंत घरत, धर्माशेठ पाटील, सरपंच संतोष घरत, संजय ठाकूर, धर्मदास घरत, निलेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अरुणा घरत व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वीचे प्रश्न, 22 टक्के भूखंडाची अजून पूर्तता झालेली नाही. एमटीएचएल करारानुसार नागरी सुविधांची पूर्तता झालेली नाही. गावातील राहत्या घरांचा प्रश्न, 135 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले त्यांचा विस्तारित गावठाणाचा प्रश्न सुटलेला नाही. हे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय भूमी संपादन करु देणार नाही, अशी नाराजी व्यक्त करुन सिडकोविरोधात शेतकर्यांनी उग्र असंतोष व्यक्त केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper