Breaking News

नेरळमधील रस्त्याची कामे बंद?

नागरिकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीकडून पुढाकार; चर्चेला उधाण

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्हा परिषद रस्त्याचे काम करीत असलेल्या नेरळ गावातील अनेक रस्त्यांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली आहेत. रस्त्याची कामे पूर्ण करताना ठेकेदाराने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने नागरिकांनी नेरळ ग्रामपंचायतला लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत नेरळ ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला कामे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यावरून नेरळ गावात विविध प्रकारच्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

नेरळ गावातील रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला केला होता. त्या निधीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करीत होते, मात्र त्या निधीमधून मंजूर असलेली आठ कामे करीत असताना ठेकेदाराकडून कामे होण्यासाठी स्थानिक नागरिकांना अनेक आश्वासने दिली गेली. ती कामे ठेकेदाराने रस्त्यावर काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण केली नाहीत. आता त्या आठ कामांमधील शेवटचे काम नेरळ पाडा भागात रस्त्याचे काम सुरू आहे, ते काम काही दिवसांत पूर्ण होणार होते, मात्र ते काम पूर्ण झाल्यावर संबंधित ठेकेदार आपली कामे संपल्याने गाशा गुंडाळून निघून जाणार याची खात्री पटल्याने नेरळमधील असंख्य नागरिकांनी ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार ठेकेदाराला नेरळ ग्रामपंचायतला तक्रारी असलेल्या नागरिकांच्या अर्धवट कामाबद्दल जाब विचारला. त्या वेळी ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नेरळ ग्रामस्थ यांच्यात अर्धवट राहिलेल्या कामाबद्दल घबराट पसरली आहे.त्यात अर्धवट राहिलेल्या कामात खांडा भागातील रस्त्याचे तब्बल 200 मीटर रस्त्याचे काम अर्धवट आहे, त्याच वेळी अन्य 80 नागरिक यांना ठेकेदाराने शब्द दिले होते, ती कामे अर्धवट आहेत.

त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतने नेरळ पाडा भागात सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडले आहे. नेरळ ग्रामपंचायत आता त्या ठेकेदारावर कामे अर्धवट ठेवल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे. त्या आधी नेरळ ग्रामपंचायतने फलक लावून नेरळ गावातील रस्त्याची कामे करताना जिल्हा परिषदेने नेमलेल्या ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने आणि शेवटचे काम संपवून ठेकेदार निघून जाण्याची शक्यता असल्याने कामे बंद केली असून होत असलेल्या गैरसोयीबद्दल नेरळकरांची दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र या फलकाने आणि रस्त्याचे काम बंद केल्याने नेरळ ग्रामपंचायतने आपल्या भागात अर्धवट कामे ठेवून नागरिकांना त्रास देणार्‍या ठेकेदाराला वठणीवर आणण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल अभिनंदन केले आहे, मात्र नेरळ पाडा भागातून जाणारा रस्ता हा पुढे मुरबाड रस्त्याला जोडला जात असल्याने गेल्या 5 मार्चपासून रस्ता बंद असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतने रस्त्याचे काम बंद ठेवल्याने आणखी काही दिवस मुरबाड रस्ता बंद राहणार आहे. त्याचा परिणाम नेरळ गावातील व्यापारावर होत असल्याने नाराजीदेखील व्यक्त होत आहे.

नेरळ गावातील सर्व कामे ही नियमानुसार होतील, पण ठेकेदाराने कोणाला शब्द दिला याबद्दल आमच्या खात्याचा काहीही संबंध नाही.

-ए. ए. केदार, उपअभियंता जि. प. बांधकाम विभाग

आम्ही ठेकेदाराला सर्व कामे नियमानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या तक्रारी लक्षात घेऊन घेतलेली भूमिका योग्य आहे.

-अनसूया पादिर, जिल्हा परिषद सदस्या

रस्त्याची कामे जिल्हा परिषद करीत आहे, त्यात आमचा काही संबंध नाही, पण ठेकेदाराने नेरळ मधील ग्रामस्थांना रस्ते करण्यासाठी अनेकांची घरे तोडली, अनेक बांधकामे तोडली, त्या वेळी संबंधित ठेकेदाराने आश्वासने दिली आहेत. त्यांच्याशी आमचा ग्रामपंचायतीचा संबंध नाही, पण नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पुढाकार घ्यावा लागला आहे.

-जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ

आमच्या घराजवळून रस्त्याचे काम करताना आमची जुनी बांधकामे तोडली, पण रस्ता करून झाल्यानंतर ठेकेदारचे कामगार अजय गोरी यांनी त्या कामाकडे दुर्लक्ष केले.त्याच वेळी ते आमचे म्हणणे ऐकत नाही, त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतकडे दाद मागावी लागली.

-संदीप म्हसकर, ग्रामस्थ

आम्ही आता नेरळ ग्रामपंचायत कडून सर्व नागरिकांच्या तक्रारी या नेरळ पोलिसांकडे देणार आहोत. पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्त्याने बाधित झालेल्या नागरिकांची कामे पूर्ण करून घ्यावी.

-अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply