अलिबाग : प्रतिनिधी
आखाती देशात नोकरी किंवा व्यावसायिक म्हणून स्थायिक झालेल्या भारतीयांना डॉ. सुनील मांजरेकर अध्यक्ष असलेल्या जीएमबीएफ फोरम या संघटनेचा फार मोठा आधार आहे. याची प्रचिती सौदी अरेबियात येमान मध्ये फसलेल्या 14 भारतीयांना आली. तब्बल 10 महिन्यानंतर या 14 जणांची जीएमबीएफ फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, चंद्रशेखर भाटिया, समाजसेविका वंदना श्रीवास्तवा यांच्या प्रयत्नाने सुटका झाली.
आयलँड ब्रिज ट्रेडिंग व ट्रान्सपोर्ट शिपिंग कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी काही तरुण सौदी अरेबियात येमान मार्गे जात होते. त्यात 14 भारतीय होते. या चौदामध्ये 5 महाराष्ट्रामधील होते. 3 फेब्रुवारी 2020 ला त्यांचा येमानमधून सौदी अरेबियात जाण्याचा प्रवास सुरु झाला.तीन जहाजातून प्रवास सुरु होता. खराब हवामानामुळे एक जहाज बुडू लागले. त्यातील प्रवाशी आणि कर्मचार्यांना दुसर्या बोटीत सुखरूप घेण्यात आले. परंतु पुढील प्रवासात त्यांना पुन्हा जोरदार वारे आणि लाटांचा सामना करावा लागला. जहाजाच्या मुख्य कॅप्टनने जहाज नांगरण्याचा सल्ला दिला. पण ज्या हद्दीत जहाज नांगरले ती हद्द येमानच्या युद्ध क्षेत्राची होती. जहाजाच्या कॅप्टनने कोणतीच परवानगी न घेता जहाज नांगरले होते. येमनच्या तटरक्षक दलाने जहाजात सर्वांना अटक केली. सर्वांचे पासपोर्ट, मोबाईल व इतर कागदपत्रे जप्त केली.
पहिले चार दिवस 14 भारतीय व जहाजतील कर्मचार्यांना समुद्रात काढावे लागले. तेथून त्यांना सना नावाच्या राजधानीत आणण्यात आले. त्यांना एका हॉटेलमध्ये बंद खोलीत ठेऊन चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर सर्व प्रकारचे दोष लावून जवळपास 1 महिना चौकशी सुरू होती. असे 10 महिने हे 14 भारतीय एका खोलीत होते. मात्र आम्ही निर्दोष आहोत, असे ठामपणे ते सर्व सांगत होते. त्यांनी जीबुती येथून भारतीय दूतावासाला माहिती दिली. लवकरच तुम्हाला सोडले जाईल, असे सांगितले जात होते पण सोडले नाही. त्यानंतर 7 आक्टोबर 2020 ला या 14 भारतीयांना येमान येथील न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. 2 नोव्हेंबर 2020 रोजी या 14 जणांची अधिकृत सुटका झाली.
दरम्यानच्या काळात या प्रकाराची माहिती जीएमबीएफ फोरम संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांना मिळाली. त्यानी तात्काळ सूत्र हलवून या 14 भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सोबत चंद्रशेखर भाटिया, वंदना श्रीवास्तवा, श्री. मोहितूर यांनीदेखील आपल्या देशवासीयांना सोडविण्यासाठी मेहनत घेतली.
डॉ. मांजरेकर यांनी सर्वांना शाब्दीक आधार तर दिलाच शिवाय या सर्वांशी कायम संपर्क ठेवला. सलग 10 महिने अडचणीत राहिलेल्या या भारतीय तरुणांना संबधीत कंपनीने पगार देणे अपेक्षित होते, मात्र जीएमबीएफ फोरमने तरुणांची ही व्यथा समजून घेत त्यांना आर्थिक सहाय्य केले.
जीएमबीएफचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर हे अलिबाग तालुक्यातील सारळ गावचे आहेत. आमची फोरम केवळ व्यवसाय म्हणून काम करीत नाही तर सामाजिक बांधिलकी जपते. आपल्या माणसांसाठी तर सदैव तत्पर असते. या 14 भारतीयांची सुटका झाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. सुनील यांनी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper