पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वाशी, मसद, शिर्कीसह 14 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे व वाड्यांना आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेण खारेपाटाला पाणीपुरवठा करणार्या शहापाडा धरणाचे पाणी डिसेंबर महिन्यातच संपते. शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील दक्षिण शहापाडा योजनेतील गावे जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून पाणी घेतात. तिकडेही आता पाण्याची समस्या आहे. उत्तर शहापाडा योजनेतील मसद, शिर्की, वडखळ बोरीसह वाशीपासून भाल विठ्ठलवाडी या टोकापर्यंत पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. 30 कोटी खर्चाच्या उत्तर शहापाडा योजनेचे काम वर्ष उलटून गेले तरी अपूर्ण आहे. वाशी विभागात पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी एका महिन्यात दोन चार वेळा तरी फुटते. तिची देखभाल करण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो. दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने असतो. एकूणच पेण तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न जैसे थे आहे. लोकांनी स्वतंत्र घेतलेल्या नळांना पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीची अवस्था बिकट आहे. पाणीटंचाईची झळ पेण तालुक्याला नेहमीच सोसावी लागते. याची सुरुवात आतापासूनच झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper