सलग सुट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव काळातील 10महिन्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे गर्दीने फुलले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किनार्यांवर गर्दी केली. पर्यटक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे पर्यटन व्यवसायदेखील पूर्वपदावर आला आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पर्यटकांची पावले रायगडच्या किनार्याकडे वळली आहेत. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया तसेच भाऊचा धक्का येथून सागरी प्रवास करत पर्यटक अलिबागला येत आहेत. याशिवाय वाहतूक कोंडीचा सामना करत त्यांनी रायगडमधील मुरूड, काशिद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर इथेदेखील गर्दी केली आहे.
कोरोना काळात सुनेसुने दिसणारे समुद्र किनारे शुक्रवार, शनिवार, रविवारी हाऊसफुल्ल झाले होते. लॉकडावूनमध्ये वैतागलेले पहिल्यांदाच बाहेर पडलेले पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेच इथं पर्यटनाचा आनंद घेत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्टसचा थरार अनुभवत आहेत. इथल्या शाकाहारी, मांसाहारी जेवणावर ताव मारत त्यांनी सगळा शीण घालवला. दरम्यान, मागील 10 महिन्यांपासून कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper