खोपोली : प्रतिनिधी
हिंदुराष्ट्राचा महामार्ग हा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे. पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. श्रीराम मंदिराच्या माध्यमातून आदर्शांची पुनर्स्थापना होणार आहे, त्यामुळे या कार्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा हातभार लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले यांनी मंगळवारी (दि. 5)खोपोली येथे केले.
श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण आणि संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी उद्योजक पंकज दळवी यांच्या हस्ते खोपोली बाजारपेठेमध्ये झाले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुरेश गोखले बोलत होते. श्रीराम मंदिरासाठी 11कोटी हिंदू कुटुंबांपर्यंत संपर्क करणार असल्याचे गोखले यांनी यावेळी सांगितले. खालापूर तालुक्यातही प्रत्येक घरी जाऊन संपर्क करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
उद्योजक पंकज भगवान दळवी यांनी या वेळी एक लाख 11 हजार 111 रूपयांचा धनादेश अभियान प्रमुखांकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मोरे यांनी केले. तालुका संघचालक राकेश पाठक, विभाग सहकार्यवाह सुनील पाटील, अभियानाचे तालुका प्रमुख केशव बुरूमकर, सहप्रमुख अनिल रोकडे, तालुका कार्यवाह अविनाश मोरे, विहिंपच्या ज्येष्ठ नेत्या अॅड. मीनाताई बाम, अॅड. राजेंद्र येरुणकर, विहिंपचे जिल्हा मंत्री रमेश मोगरे, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्यवाहिका माधवी कुवळेकर, भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, भाजपचे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष दिलीप पवार, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उद्योजक मितेश ठक्कर, व्यापारी असोसिएशनचे देवेंद्र जाखोटिया, अभय तन्ना, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, माजी अध्यक्ष दीपक बाम, मोरेश्वर दाते, कार्यालय प्रमुख विजय गोखले या वेळी उपस्थित होते.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper