इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी
लंडन : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नाही आणि त्यामुळे आता कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्यकडे सोपवण्याची मागणी जोर धरत आहे. त्यात आता इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसार याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या मागणीचा मुद्दा छेडला आहे.
32 वर्षीय विराट टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याने कर्णधारपदावरून पायउतार व्हावे, असे पानेसार म्हणाला. टीम इंडियाला विराटने अनेक द्विदेशीय मालिका जिंकून दिल्या आहेत, परंतु त्याला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारताला 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार मानवी लागली होती. ’ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. तरीही टीम इंडिया जिंकू शकत नसतील, तर विराट कोहलीने कर्णधारपद सोडावे. या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांपैकी किमान एकतरी त्याने नेतृत्वाखाली जिंकावी,’ असे पानेसार म्हणाला.
दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत असतानाही अजिंक्यने संयमी नेतृत्व कौशल्य दाखवताना युवा खेळाडूंसह बलाढ्य ‘कांगारूं’ना पराभवाची चव चाखवली. शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शुबमन गिल हे भविष्याचे स्टार या मलिकेतून टीम इंडियाला मिळाले आहेत.
भारताला नमवणे अॅशेसपेक्षा महत्त्वाचे : स्वान
ऑस्ट्रेलियाचा संघ आता जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून गणला जाऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणार्या भारतीय संघाला इंग्लंडने नमवल्यास ते अॅशेस विजयापेक्षाही महत्त्वाचे ठरेल, असे इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यांनी म्हटले आहे.
इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर 5 फेब्रुवारीपासून क्रिकेट सामने खेळणार आहे. यात चार कसोटी सामन्यांची मालिका, पाच ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली अनुपलब्ध असतानाही भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. त्यामुळे स्वान यांनी भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. ‘जागतिक क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा संघ तेवढा बलाढ्य संघ मानला जात नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला अॅशेस मालिकेपेक्षा भारताविरुद्धच्या सामन्यांची उत्सुकता असते,’ असे स्वान म्हणाले.
‘अॅशेस मालिकेची उत्कंठा आता इतिहासजमा झाली आहे. भारताला त्यांच्या देशात नमवणे, हे कौतुकास्पद यश असेल. 2012मध्ये आम्ही भारताला त्यांच्या देशात नमवण्याची किमया साधली होती. तेव्हापासून मायदेशात ते अपराजित राहिले आहेत. त्यामुळे यशाची पुनरावृत्ती हेच इंग्लंडपुढील आव्हान असेल,’ असे स्वान यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper