नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत प्रवेश करीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणार्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा आपले काम करीत असून, या संबंधी काही निवेदन द्यायचे असेल तर ते केंद्र सरकारला देण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. दिल्ली हिंसाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दखल द्यावी अशा आशयाच्या पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत आपले मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून यावर चिंता व्यक्त केली असून, ते या प्रकरणी गंभीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे कायदा आपले काम करेल. न्यायालयाला या प्रकरणात दखल देण्याची गरज नाही, असे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. दिल्ली पोलिसांनी याबाबत अनेक गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चकडे सोपविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper