पाली : रामप्रहर वृत्तसेवा
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत येथील तहसील आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालीतील भक्तनिवासमध्ये नुकताच रोजगार मेळावा संपन्न झाला. यावेळी तब्बल 385 युवक युवतींनी नोंदणी केली आहे. या सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्रालय व ग्रामीण जीवोन्नती विभाग यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमधील कंपन्या बरोबर चर्चा करून जास्तीत जास्त मुलांना तेथेच नोकर्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार तरूणांना कौशल्य प्रशिक्षण घेण्याकरिता या मेळाव्यातून निवड करण्यात आली आहे. असे व्यवस्थापक चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले. जिल्हा अभियान व्यवस्थापक सिद्धेश चंद्रकांत राऊळ यांनी या वेळी नोकरी व व्यवसाय यातील फरक सांगून व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले. या मेळाव्याला पं.स. उपसभापती उज्वला देसाई, जितेंद्र बांगरे, अक्रम शेख, करण कदम, मंगेश बिराजदार, प्रभाग समन्वयक अनुराधा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील युवक व युवती उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper