नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी नुकत्याच झालेल्या लिलावानंतर भारताच्या एका युवा खेळाडूने धमाकेदार शतकी खेळी केली. देशात सध्या विजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर मात केली. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. याआधीच्या हंगामात अखेरच्या काही सामन्यात संधी मिळालेल्या ऋतुराजने धमाकेदार खेळी केली होती. विजय हजारे स्पर्धेत ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने 50 षटकात आठ विकेटच्या बदल्यात 295 धावा केल्या होत्या. ऋतुराजने 109 चेंडूंत 102 धावा केल्या. यात नऊ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होतो. ऋतुराजचा जोडीदार सलामीवीर यश नाहरने त्याला सुरेख साथ दिली. यशने 63 चेंडूंत 52 धावा केल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार समाविष्ट होते, तर नौशाद शेख 28 धावा केल्या. केदार जाधवला 25 चेंडूंत फक्त 14 धावा करता आल्या. याशिवाय महाराष्ट्राकडून अंकित बवानेने 35, निखिल नायकने 6 धावा केल्या. संघाला आणखी धावा करता आल्या असत्या, पण हिमचाल प्रदेशच्या वैभव अरोडानेन अखेरच्या काही षटकात हॅट्ट्रिक घेत महाराष्ट्राला 295वर रोखले. वैभवने सात षटकात 45 धावा देत चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशचा डाव 48.3 षटकांत 236 धावांमध्ये संपुष्टात आला. गेल्या वर्षी कोरोनामुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने अखेरच्या तीन सामन्यांत तीन अर्धशतके झळकाविली होते. त्याच्या या धमाकेदार कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता. डिसेंबर 2018 साली चेन्नईने 20 लाखच्या बेस प्राइसवर ऋतुराजला विकत घेतले होते, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात मिळालेल्या संधीचा त्याने भरपूर फायदा घेतला. आयपीएल सुरू होण्याआधी त्याला कोरोनाची लागण झाली होती, पण कोरोनावर मात करून फिट होऊन तो परत आला आणि त्याने मैदान गाजविले.