अहमदाबाद ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी खेळपट्टीला नावे ठेवली, पण इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याने मात्र इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.
इंग्लंडचा संघ पहिली कसोटी सहज जिंकला. त्यानंतर दुसर्या कसोटीसाठी त्यांनी संघात चार बदल केले. महत्त्वाची बाब म्हणजे ‘रोटेशन पॉलिसी’च्या (प्रत्येक खेळाडूला विश्रांती मिळावी म्हणून संघात बदल) नावाखाली पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंनाही संघाबाहेर करण्यात आले. या मुद्द्यावरून इयन बेलने इंग्लंड संघ व्यवस्थापनाचा समाचार घेतला. भारतीय संघ काही महिन्यांनी इंग्लंडमध्ये येणार आहे. त्यांचा संघ मालिकेत 1-0 किंवा 2-0ने आघाडीवर असेल, तर ते रोटेशन पॉलिसीचा विचार करतील असे वाटते का? मला वाटत नाही. इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया किंवा भारत दौरा हा कायम खास असतो. त्यांच्या भूमीवर पाहुण्यांनी विजय मिळवणे हे चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते. भारत इंग्लंडमध्ये 1-0ने आघाडीवर असेल, तर ते त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाजांना नक्कीच संघाबाहेर बसवणार नाहीत. कारण त्यांना सामना जिंकण्याचे महत्त्व माहीत आहे, अशा शब्दांत बेलने संघ निवडीवर टीका केली आहे.