भर अधिवेशनात केंद्रीय मंत्र्यांनी झापले
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
स्वतंत्र मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मागणीवर या खात्याचे मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेत पुन्हा एकदा निशाणा साधला. इतकेच नाही तर भारत सरकार अंतर्गत कोणकोणते विभाग काम करीत आहेत याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्याची गरज आहे, असल्याचा टोलाही सिंह यांनी लगावला.
देशात मत्स्यपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांवर भाजप खासदार सुनिता दुग्गल यांच्या प्रश्नाला गिरीराज सिंह उत्तर देत होते. ’2 फेब्रुवारी रोजी लोकसभेत राहुल गांधी यांनी आपल्या विभागाशी संबंधित प्रश्न विचारला होता आणि काही दिवसांनंतर ते स्वत:च विसरून गेले की देशात हा विभाग काम करीत आहे. राहुल गांधींची स्मरणशक्ती संपुष्टात आली की, आणखी काय झाले माहीत नाही. राहुल गांधी यांनी 2 फेब्रुवारी रोजी प्रश्न उपस्थित करूनही पुदुच्चेरी आणि कोचीनमध्ये जाऊन मत्स्यपालन विभागच नाही, मी सरकारमध्ये आलो तर एक स्वतंत्र मंत्रालय बनवेन, अशी वक्तव्य केल्याने मला धक्का बसला’, असे सिंह यांनी म्हटले.
या वेळी गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर मत्स्यपालन क्षेत्राची अवस्था बिकट ठेवण्याचा आरोप केला. ’2014पर्यंत अनेक पिढ्या राज्य करूनही केवळ 3682 कोटी रुपये वाटप करण्यात आले. मोदी सरकारने मात्र गेल्या सहा वर्षांत 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली’ असा दावाही सिंह यांनी केला.
’मोदीजींनी 2019 साली दोन विभाग बनवले होते आणि यांना माहितीच नाही की मस्त्यपालन विभाग कुठे आहे? यांच्या नेत्याला शाळेत पाठवा. यांना सांगा की भारतात कोणकोणते विभाग काम करीत आहेत’ अशी टिप्पणी सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper