ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन
पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील कानसळ गावातील जनतेला विजेसंबंधीच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाची वाढती लोकसंख्या तसेच विजेचा वापर व उपलब्ध सामुग्रीची सांगड बसत नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या अनुषंगाने कानसळ गावातील विद्युत समस्या सोडवाव्यात. मुबलक वीजपुरवठ्यासाठी थ्री फेज लाइन व डीपीची क्षमता वाढवावी, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पाली महावितरण उपअभियंत्यांना मंगळवारी (दि. 23) दिले.
गावाला पाणीपुरवठा करणारी नळ पाणीपुरवठा योजना आंबा नदीवर आहे. पावसाळ्यात बर्याचदा विद्युत पुरवठा खंडित होतो. अशातच ही वाहिनी जमिनीपासून कमी अंतरावर आहे. जीवितहानी टाळण्यासाठी व नियमित विद्युत पुरवठा होण्यासाठी ही वाहिनी उंचावरून खेचून नेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.
या वेळी किसन उमटे, मंगेश गिरी, संदीप उमटे, सुभाष धानिवले, तेजेश गिरी, सुरज नलावडे, जितेंद्र दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, ग्रामस्थांनी रवींद्रनाथ ओव्हाळ यांची पाली बसस्थानक येथील उपोषणस्थळी भेट घेऊन वीज प्रश्नावर चर्चा करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
RamPrahar – The Panvel Daily Paper