Breaking News

तीन जणांचे बळी घेणार्या स्पॉटवर गतिरोधक

पोलीस प्रशासनाचा पुढाकार

कर्जत : बातमीदार

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सोमवारी झालेल्या  अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या राज्यमार्गावरील अपघात प्रवण क्षेेत्रात गतिरोधक उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर सोमवारी (दि. 29) भरधाव वेगाने आलेल्या हुंडाई एक्ससेंट कारने रिक्षेला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकाच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन रिक्षेतील सुभाष जाधव, शुभांगी जाधव आणि सरिता साळुंखे यांचा होरपळून मृत्यू झाला होता. गतिरोधक नसल्यामुळे या राज्यमार्गावर मागील वर्षभरात 11 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या राज्यमार्गावर गतिरोधक उभारण्याची मागणी भाजप व अन्य राजकीय पक्ष, मानवाधिकार संस्था, पोलीस मित्र संघटना यांनी केली होती.

दरम्यान, सोमवारी झालेल्या अपघातानंतर कर्जत पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन या राज्यमार्गावर गतिरोधक बसविण्याची सूचना केली होती. त्याची दखल घेऊन अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी अपघात घडला त्या ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक बनवून घेतले आहेत. त्याचवेळी या रस्त्यावर अपघात घडत असलेल्या विविध 11 ठिकाणीदेखील गतिरोधक बसविले जात आहेत.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply