बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 9 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
एएनआय या वृत्तसंंस्थेशी बोलताना सौरव गांगुलीने सांगितले की, आयपीएलच्या नव्या हंगामाचे आयोजन वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर गांगुली याने ही माहिती दिली.
दरम्यान, मुंबईत लॉकडाऊन लागले तरी क्रिकेटचे सामने वेळापत्रकाप्रमाणे आयोजित होतील, असे सौरव गांगुलीने स्पष्ट केले. तो टेलिग्राफशी संवाद साधताना म्हणाला की, लॉकडाऊन लागल्यास ते चांगलेच असेल. आजूबाजूला अधिक लोक नसतील. बायो बबलमध्ये नसलेल्या काही मोजक्याच लोकांवर लक्ष द्यावे लागेल. जे बायो बबलमध्ये आहेत त्यांची सातत्याने चाचणी होत आहे. जेव्हा तुम्ही बायो बबलमध्ये जाता तेव्हा काही होत नाही. गेल्या वर्षी यूएईमध्ये आयपीएल होत असताना अशा काही घटना घडल्या होत्या, मात्र एकदा स्पर्धा सुरू झाली की, सर्व काही सुरळीत होईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper