नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रसार वेगाने होत असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अशातच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भयावह बाब म्हणजे वाढणार्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या देशात आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसह डबल म्युटेशनही भारतात आढळून आले असून, त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. देशात दररोज विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या रुग्णवाढीच्या आकडेवारीने आतापर्यंतचे 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासांत दोन लाख 61 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर याच कालावधीत एक लाख 38 हजार 423 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत 24 तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात एक हजार 501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या एक लाख 77 हजार 150वर पोहचली आहे. महाराष्ट्रात नवा विक्रम : देशात महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यासारखीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 67 हजार 123 कोरोनाबाधित आढळून आले. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी रुग्णवाढ असून, 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर आता 1.59 टक्के इतका आहे, तर एकूण 59 हजार 970 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या सहा लाख 47 हजार 933 रुग्ण उपचार घेत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper