पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वच सरकारी यंत्रणांनी कोरोना संसर्गाबाबतच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कडक निर्बंधांचे पालन करण्यास भाग पाडून दंडात्मक कारवाईदेखील करून वसुलीचा सपाटा लावला आहे. परिणामी शहरासह तालुक्यातील व्यापार व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सुरूवातीला शहरामध्ये नगरपंचायत तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पंचायत समिती, आरोग्य विभाग, ग्रामीण रूग्णालय, तहसिल कार्यालय आणि पोलीस प्रशासन सक्रीय झाले असताना तहसीलदारांना इन्सिडंट कमांडरचा दर्जा देण्यात आला. मात्र, कालांतराने सर्वांत जास्त पोलीस प्रशासनाचा प्रभाव कोरोनाच्या लॉकडाऊनवर दिसून येऊ लागला असून सद्यस्थितीत नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे पोलादपूर शहरात फिरून मास्कविना फिरणार्यांवर तसेच दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी असणार्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. या लॉकडाऊनमध्ये कोणीही कोणाला माणुसकी दाखवित नसून सर्वसामान्यांना रोजगाराचे साधन बंद पडूनही कोणताही दिलासा अथवा मदतीचा हात मिळत नसल्याचे दृश्य विदारक आहे. याकाळात पोलादपूर नगरपंचायत अथवा तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींकडून कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना अथवा सॅनिटायझर्स तसेच सुरक्षा उपाययोजनांचे वाटप करण्यात आले नाही. शहरासह तालुक्यातील अतिदूर्गम भागात जिथे आजमितीस सरकारी योजनाही पोहचल्या नाहीत तेथेही कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याची धक्कादायक परिस्थिती जाणवत आहे. तालुक्यातील 21 एप्रिलला कोरोना पेशंटची एकूण संख्या 596 झाली असून 447 जणांना उपचारांनंतर रूग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले आहे. आतापर्यंत 30 रूग्ण दगावले असून 82 होम क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमध्ये 28 असे 119 रूग्ण पॉझिटिव्ह आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper