इंग्लंड ः वृत्तसंस्था
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) समर्थन केले आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतात आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता. या टी-20 लीगद्वारे काही तास लोकांचे मनोरंजन होत होते आणि हा एक दिनक्रम होता, असे पीटरसनने म्हटले आहे. भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या लाटेत आयपीएलचा 14वा हंगामही खेळवण्यात येत होता, मात्र बायो बबलचा फुगा फुटल्याने बीसीसीआयला आयपीएलचा हा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावा लागला. खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता बीसीसीआयच्या या निर्णयाचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले. ज्या परिस्थितीत भारतातील लोक कोरोनाशी झुंज देत आहेत अशात आयपीएल खेळवणे चुकीचे होते, अशी मतेही समोर आली. यावर पीटरसनने एका वृत्तसंस्थेत लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे, कोरोनामुळे लोकांची अवस्था वाईट असताना आयपीएल खेळवण्याचा निर्णय चुकीचा होता या मताच्या लोकांशी मी सहमत नाही. माझा विश्वास आहे की, स्पर्धा सुरू ठेवणे ही भारतासाठी एक सकारात्मक गोष्ट होती. देशाची परिस्थिती चांगली नाही, परंतु दररोज चार-सहा तास करमणूक होणे ही एक सकारात्मक बाब आहे. आम्ही संपूर्ण भारतभर एक कार्यक्रम करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने दिलेले पॅकेज चांगले होते, विकेट संथ होती, पण क्रिकेट मजेदार होते. कोरोना विषाणूमुळे आयपीएलचा 14वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.