Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी सर्वपक्षीय एल्गार

नवी मुंबई विमानतळासंदर्भात राज्य सरकारचे वेधले लक्ष

पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी शुक्रवारी (दि. 14) येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारकडे केली.
गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या संबंधी उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, स्थानिक प्रकल्पग्रस्त व नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची जोरदार मागणी केली आहे. त्या संदर्भात पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस महेंद्र घरत, भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, कार्यकारिणी सदस्य अतुल भगत, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, संतोष केणी, के. के. म्हात्रे, निलेश पाटील, नंदराज मुंगाजी आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी, नवी मुंबईला विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी जोरदार मागणी समितीच्या माध्यमातून केली, तसेच वेळ पडल्यास आंदोलने करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. ते पुढे म्हणाले की, या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. असे असताना अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी 2 जानेवारी 2015 रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता, त्यांनी तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 19 जून 2018 रोजी पाठविला. फडणवीस यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे 7 जुलै 2018 रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते, तसेच अनेक स्थानिक आगरी-कोळी आणि 10 गाव संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणी केली होती, पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कृती केली आहे  त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांमध्ये सिडकोविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आले नसताना आणि कोरोनाचा बिकट काळ असताना सिडकोच्या ’एमडीं’नी धिसाडघाईने प्रस्ताव सादर केला. ‘एमडीं’च्या या भूमिकेचा पाटील यांनी या वेळी जाहीर निषेध केला. ते म्हणाले की, दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षांचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी व शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचले. 1984 साली शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व सार्‍या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकर्‍यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे हे तत्व प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे सार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते.
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधिमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमाप्रश्न अशा अनेक जनलढ्यांत त्यांनी हिरीरिने भाग घेऊन तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागृत राहावी याकरिता नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्व पक्षांच्या नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी समितीतर्फे दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल येथील जनतेच्या मनात नितांत आदर असून, त्यांचे व्यक्तिमत्त्वही उत्तुंग आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्पांना देता येईल. मुंबईत त्यांचे छत्रपती शिवाजी पार्क येथे कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन अलिकडेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे. ‘दिबा’साहेब शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजविणारे व्यक्तिमत्त्व होते. ते येथील जनतेसाठी लढले त्यांचे घरही लोकवर्गणीतून बांधण्यात आले आहे. नवी मुंबईच्या निर्मितीसाठी व महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांचे जे योगदान आहे त्याला तोड नाही. म्हणून येथील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे; अन्यथा आंदोलन उभारणार असल्याचा पवित्रा त्यांनी जाहीर केला आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व पाठपुरावा समिती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार व्हावा -आमदार प्रशांत ठाकूर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, मी सिडकोचा अध्यक्ष होतो त्या काळात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, स्थलांतर, त्यांना योग्य भरपाई मिळावी अशा पद्धतीची चर्चा व इतर निर्णय घेण्यात आले. कुठलाही प्रकल्प सुरू झाला आणि तो अंतिम टप्यात आल्यानंतर त्या प्रकल्पाचे नामकरण केले जाते. राज्यात एखाद-दुसरा त्याला अपवाद असू शकतो, पण पूर्णत्वास आल्यानंतर नाव दिले जाते. विमातळाबरोबरच न्हावा शिवडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या प्रकल्पाला नाव दिले नाही. अनेक प्रकल्प आहेत त्यांना नंतर नाव दिले गेले. मी अध्यक्ष असताना सिडकोच्या संचालक मंडळापुढे नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक संघटना, पक्ष यांच्या बैठका झाल्या, मात्र त्यामध्ये प्रस्ताव आला नाही. कारण नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आलेलेच नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको यासाठी आमचा संघर्ष नाही तर येथील 95 गावातील प्रकल्पग्रस्त, स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे
भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावा ही आमची आग्रही मागणी आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply