दोन वर्षे उलटूनही उपाययोजना नाही
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावावरही दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, तेथील दोन कुटुंबे दहशतीखाली वावरत आहेत. तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली होती, त्याला दोन वर्षे होऊनही अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही.
वर्हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळपाडा येथे रविंद्र शंकर कदम यांच्या घराच्या मागे मोठी टेकडी असून, त्या टेकडीचे मोठंमोठे दगड निखळत आहेत. येथील काही मोठ्या दगडांना लाकडी खांब लावून थोपवून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दगडांमधील माती पावसाच्या पाण्याबरोबर हळूहळू निघत असून तळीये, माळीनसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी 24 जुलै 2019 रोजी जांभुळपाडा गावातील या धोकादायक जागेची पहाणी केली होती. त्या वेळी त्यांनी जांभुळपाडा ग्रामपंचायत व संबंधित खात्याला उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षे झाली तरीही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे येथील रहिवासी जीवमुठीत धरुन दिवस काढत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper