सावित्रीला वीरेश्वराचा नारळ अर्पण
महाड : प्रतिनिधी
महाडमधील कित्येक वर्षे खंडित झालेली एक परंपरा आज पुन्हा सुरू झाली. सावित्री नदीला वीरेश्वराचा नारळ महाजनांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. सावित्रीने महाडकरांवर कृपा ठेवावी, अशी विनंती करण्यात आली.
ब्रिटिश काळात बंद पडलेली एक प्रथा आज महाडकरांनी पुन्हा सुरू केली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वीरेश्वर देवस्थानचे पालखीचे मानकरी महाजन कुटुंबातील सुधीर शंकर महाजन यांच्या हस्ते हा नारळ वाजत गाजत आज सावित्रीला अर्पण करण्यात आला. महाड येथील जुन्या मैकावती मंदिर येथील बंदरावर पूर्वपरंपरेनुसार सुहासिनींनी सावित्रीची खणानारळाने ओटी भरली. त्यानंतर मानकरांनी सावित्रीला आवाहन केले आणि महाडकरांवर आलेले संकट पुन्हा येऊ नये, अशी प्रार्थना केली. यानंतर सावित्रीला नारळ अर्पण करण्यात आला. या वेळी देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टेंसह महाडकर नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper