मुंबई ः प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र याबाबत राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली असून मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशाराच राष्ट्रवादीला दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
विधान परिषदेवरील रखडलेल्या 12 सदस्यांची नियुक्ती लवकर करावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या वेळी राज्यपालांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात सादर करण्यात आलेल्या 12 नावांच्या यादीत
एक बदल करण्याचे पत्र देण्यात आले. राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझोता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचे आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झाले तरी मला आमदार करा नाही तर जीव सोडणार, असे माझे म्हणणे नाही आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. शेट्टी यांनी करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन, असा इशाराही या वेळी दिला.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper