Breaking News

नवी मुंबईकरांना जलदिलासा; मोरबे धरण ओव्हरफ्लो!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील जलसाठ्याने 88 मीटर इतकी पूर्ण उंची गाठून आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे. मोरबे धरणाद्वारे नवी मुंबई महापालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी जलस्त्रोतावरील या धरण प्रकल्पाचा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला असून माथेरानच्या प्रदूषणविरहित प्रदेशातून येणारा हा जलस्रोत असल्याने येथील पाणी मूलत:च शुध्द आहे. प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प अविरत पर्जन्यवृष्टीमुळे संपूर्ण भरला असून 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी गाठलेली आहे. मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात यावर्षी आजतागायत 3748.60 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत 190.890 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. आज मोरबे धरणाचे दरवाजे 25 सेमीने उघडले असून 1123 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरणे ही नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने ही आनंदाची व समाधानाची बाब असल्याचे सांगत आयुक्त अभिजित बांगर यांनी आपण जलसमृध्द असलो तरी पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply