शेतकर्यांना मदत न मिळाल्याने फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर ः प्रतिनिधी
मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ताशेरे ओढले आहेत. सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या आहेत. त्या शेतकर्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत हे वास्तव आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी पुढे म्हटले की, मंत्री किंवा राज्यातील प्रमुख लोक तिथे गेले, तर प्रशासनदेखील जागे होत असते आणि लोकांना काहीतरी दिलासा मिळत असतो. अशा परिस्थितीत कुणीतरी आपले ऐकतेय असे लोकांना वाटत असते आणि ते महत्त्वाचे असते. आम्हीदेखील उद्यापासून मराठवाडा दौर्यावर जाणार आहोत. तिथली परिस्थिती सरकारपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
पहिल्यांदा नजर आणेवारीच्या आधारावरच मदत करता येते. वैयक्तिक पंचनाम्याची आवश्यकता पडत नाही. पंचनामे होत राहतील, पण आधी तातडीची मदत काय करता येईल याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे, असेही फडणवीसांनी नमूद केले.
नुकसानीची पाहणी
यवतमाळ : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील निळापूर येथे शेतावर जाऊन पाहणी केली. कापूस, सोयाबीनचे चांगले पीक आले असताना पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना राज्य सरकारने तातडीने मदत केली पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी या वेळी केली.
काँग्रेसच्या नाना पटोलेंना टोला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंह यांना देशाबाहेर जाण्यासाठी केंद्राने मदत केल्याचे वक्तव्य पटोलेंनी केल्यानंतर राज्याचे फडणवीस यांनी पटोले यांना टोला लगावला आहे. नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर देता येणार नाही. पटोले असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतदेखील बोलू शकतात, असे फडणवीस म्हणाले.