कर्जत गुडवणवाडीमध्ये मोठी पाणीटंचाई; 24 अंश तापमानात कोरड्या नदीमध्ये डवरे खोदले



कर्जत : बातमीदार
तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गुडवणवाडीमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासी महिला डोंगर उतरून कोरड्या असलेल्या चिल्हार नदीपात्रात येत असून, तेथे डवरे खोदून त्या थेंब थेंब पाणी गोळा करतात. ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाणी चार दिवसांनी वाडीत पोहचत असल्याने या महिलांना 42 डिग्री तापमानात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नेरळ-पिंपळोली-सुगवे रस्त्यावर असलेल्या गुडवण गावाची वाडी तेथून दोन किलोमीटर अंतरावर पोशीर गावाच्या हद्दीत वसलेली आहे. गुडवण येथून कच्चा रस्ता वाडीपर्यंत जात असून त्या दगड धोंड्यांच्या रस्त्याने गुडवणवाडीमधील आदिवासी महिला पिण्याचे पाणी डोक्यावरून वाहून आणत आहेत. ग्रामपंचायतीकडून राबविली जाणारी नळपाणी योजना ही सर्व भागाला पाणी पुरविण्यास सक्षम नसल्याने कमी अधिक प्रमाणात नळाचे पाणी पोहचविण्याचा ग्रामपंचायतचा प्रयत्न असतो. त्यामुळे सहा गावे आणि सात आदिवासी वाड्यांचा समावेश असलेल्या नळपाणी योजनेचे पाणी गुडवणवाडीमध्ये चार दिवसांनी पोहचते. परिणामी कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याची तहान भागविण्यासाठी या वाडीमधील महिला रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन किलोमीटर अंतर उतरून सध्या कोरड्या असलेल्या चिल्लार नदीपात्रात येतात व तेथे डवरे खोदून पाणी गोळा करतात. नदी कोरडी असल्याने सर्व डवर्यांमध्ये पाणी तत्काळ साठत नाही. त्यामुळे सकाळी दोन हांडे घेऊन डोंगर उतरून खाली आलेल्या महिलांना पाण्याने भरलेले हांडे घेऊन घरी पोहचायला दुपार होते. 45 घरांची लोकवस्ती असलेली ही वाडी पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवाडी जवळ आहे. चिंचवाडीमध्येही पाण्याची समस्या गंभीर असल्याने शेवटी येथील महिलांना डोंगर उतरून ये-जा करण्याची कसरत करावी लागत असल्याबद्दल कर्जत तालुका आदिवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
गेले तीन महिने पाण्याची समस्या भीषण झाली असतानाही टँकर सुरू करण्यात आडकाठी केली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच कर्जत प्रांत अधिकारी आणि तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल.
-जैतु पारधी, अध्यक्ष, कर्जत तालुका आदिवासी संघटना
ग्रामपंचायतीची नळपाणी योजना ही अनेक गावासाठी आणि वाड्यांसाठी एकच असल्याने दररोज सर्वत्र पाणी पोहचवता येत नाही. गुडवणवाडीसाठी नवीन विहीर मंजूर केली असून, त्या विहिरीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर त्यातून मार्ग काढला जाईल.
-वृषाली क्षीरसागर, सरपंच, बोरिवली ग्रुप ग्रामपंचायत, ता. कर्जत
RamPrahar – The Panvel Daily Paper