अबू धाबी : वृत्तसंस्था
गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या (41 चेंडूंत 60 धावा डाव सोडला) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला आठ गडी आणि 13 चेंडू राखून सहज नामोहरम केले. सलग दोन लढती जिंकून भारताने रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणार्या ‘अव्वल-12’ फेरीतील महामुकाबल्यासाठी आपली पूर्ण तयारी झाल्याचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाने दिलेले 153 धावांचे लक्ष्य भारताने 17.5 षटकांत गाठले. रोहितने के. एल. राहुलसह (39) 68 धावांची सलामी दिल्यावर सूर्यकुमार यादवच्या (नाबाद 38) साथीने दुसर्या गड्यासाठी 59 धावांची भर घालून विजयाची पायाभरणी केली. हार्दिक पंड्याने (नाबाद 14) षटकार लगावत संघाचा विजय साकारला. तत्पूर्वी, आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (57), मार्कस स्टोयनिस (नाबाद 41) आणि ग्लेन मॅक्सवेल (37) यांनी दिलेल्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने 5 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : 20 षटकांत 5 बाद 152 (स्टीव्ह स्मिथ 57, मार्कस स्टोयनिस नाबाद 41; रविचंद्रन अश्विन 2/8) पराभूत वि. भारत : 17.5 षटकांत 2 बाद 153 (रोहित शर्मा 60 डाव सोडला, के. एल. राहुल 39, सूर्यकुमार यादव नाबाद 38)
RamPrahar – The Panvel Daily Paper