नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत गुरूवारी (दि. 4) जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. या वेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत संवाद साधला. या वेळी संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल, असे सांगताना मोदींनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले सैनिक हे भारत मातेचे सुरक्षा कवच असल्याचे म्हटले. सर्जिकल स्ट्राईकमध्ये येथील ब्रिगेडने जी भूमिका बजावली आहे ती प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान निर्माण झाला असल्याचे ते या वेळी म्हणाले. तसेच देशाच्या संरक्षण खर्चासाठी जितका अर्थसंकल्प होता, त्यातील 65 टक्के देशातच खरेदीवर खर्च होत आहे. 200 पेक्षा अधिक वस्तू आणि उपकरणे देशांतर्गतच खरेदी केली जाणार असल्याचे सरकारने ठरवले आहे. पुढील काही महिन्यात यात अधिक सामानाची वाढ होईल. यामुळे संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल. नव्या शस्त्रास्त्रांसाठी आणि उपकरणांसाठी देशातील गुंतवणूक वाढेल. देशात आज अर्जून टँक आणि तेजससारखी कमी वजनाची एअरक्राफ्ट्स तयार होत आहेत. आपल्या ज्या ऑर्डिनन्स फॅक्ट्ररीज होत्या, त्या आता स्पेशल इक्विपमेंट्स तयार करणार आहेत. विजयादशमीच्या दिवशी सात डिफेन्स कंपन्या राष्ट्रसेवेसाठी समर्पित करण्यात आल्या, असेही त्यांनी नमूद केले.
मी आज पुन्हा तुमच्यामध्ये आलो आहे. आज पुन्हा तुमच्याकडून नवी ऊर्जा, आशा आणि विश्वास घेऊन जाणार आहे. मी या ठिकाणी एकटा आलेलो नाही, मी 130 कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. दीपावलीचा दिवा तुमची वीरता, पराक्रम, शौर्य आणि त्यागाच्या नावावर प्रत्येक भारतीय त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तुम्हाला कायम अनेक शुभेच्छा देत राहिल, असेही ते म्हणाले.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper