Breaking News

ट्वेन्टी-20 मालिकेतील निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे -रोहित; अश्विनचे खास कौतुक

कोलकाता ः वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, दुबईतील पुनरागमनापासून ते आतापर्यंतचा अश्विनचा खेळ हा प्रभावी ठरला आहे. तो एक दर्जेदार गोलंदाज असल्याचे सर्वश्रुतच आहे. गेली अनेक वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये त्याने हे सिद्ध केले आहेच, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी फारशी वाईट नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये मधल्या षटकांतील डाव महत्त्वाचा असतो. अश्विनसारखा गोलंदाज संघात असतो, तेव्हा तो महत्त्वाच्या फलंदाजांचे अडसर दूर करतो, अशा शब्दांत रोहितने त्याची उपयुक्तता अधोरेखित केली. रोहितने अक्षर पटेलच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. आम्ही संघात निरोगी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. खेळाडू निडरपणे मैदानावर खेळू शकतील यासाठी त्यांना बळ देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे रोहितने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील बदलाचे विश्लेषण करताना सांगितले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply