कर्जत : बातमीदार
राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे मविआ सरकार बलात्कार, मुलींची छेडछाड, फूस लावून पळवून नेणे, अपहरण करणे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे या लोकांची हिंमत या सरकारच्या काळात वाढली आहे. अशा बलात्कारी लोकांना शासन न करता राजाश्रय देण्याचे काम मविआ सरकार करीत असल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केला. कर्जत येथील तीन शाळकरी मुली नागपूर येथे सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.
कर्जत येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या असता भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि राज्याच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज्यातील मविआ सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढण्यास जबाबदार धरले. कर्जत शहरातील मुली सुदैवाने सापडल्या असून त्या चंदीगड येथे पोहचल्या असत्या, तर आपल्याला त्यांचे पुढे काय झाले हे समजलेही नसते. त्या मुली नागपूर येथून परत आल्यानंतर त्यांना कोणी फूस लावून नेले की त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न होता हे कळेलच, पण शाळेत गेलेल्या मुली नागपूरपर्यंत कशा पोहचल्या याबाबत आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे या वेळी चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि मुलींचे अपहरण करणार्या आरोपींना अटकपूर्व जामीन देऊ नये आणि पॉक्सोअंतर्गत गुन्ह्यातील आरोपींवर 90 दिवसांत चार्जशीट दाखल करावी या भाजपच्या मागण्या सरकार मान्य करून कायदा करत नाही. कारण त्यांना आरोपींना राजाश्रय द्यायचा आहे, असा आरोप शेवटी चित्रा वाघ यांनी केला.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper