Breaking News

रामशेठ ठाकूर यांचा ‘रयत’च्या विकासात मोठा वाटा – खासदार शरदराव पवार

सातारा येथे उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शानदार उद्घाटन  

कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे
थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्याकडील धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करीत रयत शिक्षण संस्थेला भरभरून दिले आहे. या संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदराव पवार यांनी सोमवारी (दि. 27) सातारा येथे केले.
तन, मन, धनाने शिक्षण क्षेत्राला सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अफाट कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अद्ययावत सुविधायुक्त अशा ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरदराव पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात समारंभपूर्वक झाले. कर्मवीरांच्या भूमीत आजचा दिवस केवळ रायगडच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात समाजसेवकाची भूमिका बजावली आणि हा सोहळा डोळ्यांत आणि हृदयात साठवून ठेवण्यासाठी राज्यातून विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते. या हृद्य सोहळ्याने सर्वच जण भारावून गेले. संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी बनले होते. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना खासदार शरदराव पवार बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, सुपुत्र आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. दिलावर मुल्ला, मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य मीनाताई जगधने, अ‍ॅड. रवींद्र पवार, राजेंद्र फाळके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ठाकूर कुटुंबीय यांच्यासह संस्थचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तसेच पनवेल महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.
खासदार शरदराव पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, रामशेठ ठाकूर ज्या भूमीत शिक्षण घेऊन मोठे कर्तृत्ववान झाले त्या भूमीला ते विसरले नाही. त्यांच्या नावाने सातार्‍यात भवन उभारण्यात आले आहे. आज त्याचे उद्घाटन झाले. त्यामुळे आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आणि आनंददायी दिवस असल्याचे सांगतानाच रामशेठ यांच्याकडून संस्थेच्या विकासासाठी कधीही नकार शब्द आला नाही. रयत शिक्षण संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा असल्याचा उल्लेख शरदराव पवार यांनी विशेषत्वाने केला. संस्थेत जेव्हा कोणताही प्रकल्प करायचा असेल तेव्हा रामशेठ यांचे नाव येत नाही तोपर्यंत काम पूर्ण होत नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर रामशेठ ठाकूर ‘रयत’चे खरे हितचिंतक आहेत, असे त्यांनी या वेळी स्पष्टपणे सांगितले.
रायगड जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्या जिल्ह्यामध्ये अनेक कर्तृत्ववान लोकं पुढे आली. दि. बा. पाटील यांच्यासह अनेक सहकार्‍यांचे नाव घेता येईल, पण या सगळ्या सहकार्‍यांमध्ये जोपर्यंत रामशेठ ठाकूर यांचे नाव येत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही, असे शरदराव पवार यांनी म्हटले. संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांनी कधीही कसूर केला नाही. वेळोवेळी मदत केली. रायगड, नवी मुंबई, त्याचबरोबर राज्यातील विद्यालयांना कोटीच्या कोटी रुपयांनी मदत केली आहे, असे सांगतानाच शरदराव पवार यांनी मदतीची मोठी यादी वाचून रामशेठ ठाकूर यांनी केलेली मदत म्हणजेच ‘रयत’ला सर्वस्व अर्पण केले असल्याची प्रतिक्रिया देत रामशेठ ठाकूर यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याची पोचपावती दिली.
कर्मवीर अण्णांनी शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेमहाराज यांचे विचार मनात आत्मसात करून वाटचाल केली. त्यांच्या आदर्शाचा वारसा पुढे चालविण्याचे काम होत आहे. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी निष्ठा, नाते, बांधिलकी लागते आणि त्यातूनच समाजाप्रती भावना निर्माण होतात. रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उदार मनाने कार्य केले आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक जडणघडणीत रामशेठ यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे सांगतानाच रामशेठ आणि मी ‘रयत’च्या विकासासाठी काम करीत राहू, असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हणत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या उभारणीत आणि यशात मोठे योगदान असल्याची प्रांजळ कबुली दिली.
कमालीची लोकप्रियता असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांची राजकारणीपेक्षा समाजकारणी म्हणून समाजात प्रतिमा आहे. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रूची आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी हे तत्त्व त्यांनी सुरुवातीपासून अंगीकारले. दररोज हजारो लोक त्यांना भेटण्याकरिता येतात. त्यामध्ये अडचणींची सोडवणूक करण्याबरोबरच मदतीच्या अपेक्षेने अनेक जण येतात आणि त्यांच्याकडे आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत कधीच जात नाही. अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम ते करतात. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम घेण्याची तयारी या गुणांचे बाळकडू त्यांना लहान वयातच आई-वडिलांकडून मिळाले होते. त्यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना आपल्या अंतर्मनात शिक्षणाविषयीची आस त्यांनी जागृत ठेवली.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वाने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिक्षणाची जाण ठेवत रयत संस्थेच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने मदतीचा हात देऊ केला आहे. आज त्यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत असून ‘रयत’नेही त्यांचे नाव अनेक विद्यालयांना देऊन त्यांच्या कार्याची पावतीच दिली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे, परंतु त्यांनी या संस्थेपेक्षा रयत शिक्षण संस्थेच्या विकासाला अधिक महत्त्व दिले आणि रयत शिक्षण संस्थेला कायम मातृसंस्था मानून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वाटचाल सुरू आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी हाक दिल्यानंतर प्रत्येक वेळी त्या हाकेला प्रतिसाद देऊन ‘रयत’च्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान समाजाला आदर्श देणारे आहे. केवळ समाजासाठी जगणारे लोकमान्य लोकनेता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असून सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, सकारात्मक विचारसरणी, प्रामाणिकपणा, अचूक निर्णयक्षमता, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा या गुणांमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची महती देशभरात आहे.
‘रयत’च्या स्वप्नांचे शिल्पकार ठरलेले कर्मवीर अण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम सुरू ठेवले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व रायगड विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. त्या जबाबदारीचे कर्तव्यभावनेत रूपांतर करून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल, नवी मुंबई व रायगड आणि राज्यातील इतर अनेक शाखा सोयीसुविधायुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या सेवाभावी वृत्तीचे सदोदित दर्शन घडवत ‘रयत’चे शैक्षणिक काम म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचे काम असे समजून सदैव त्यात झोकून देऊन शैक्षणिक प्रगतीची दारे त्यांनी सर्वांना खुली केली. त्यांच्या अफाट कार्याची दखल घेत सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ लोकार्पित झाले आहे आणि भावी पिढीसाठी ही आदर्श वास्तू प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी, तसेच तमाम रयत सेवकांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इतिहासात ज्या थोर व महनीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली. त्या व्यक्तींमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. आशिया खंडात नावाजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे दातृत्वाचा नवा सर्वोच्च आविष्कार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ख्याती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य असणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे ‘रयत’च्या लहान मोठ्या शाखांचे व रयत सेवकांचे आदर्श आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार केला, तर राज्यात लोकनेते या पदाला पोहचलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच व्यक्ती आहेत, त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आदराने नाव घेतले जाते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतिशील विचारांचा समृद्ध वारसा ते पुढे चालवित आहेत. त्यांच्यातील दातृत्व या असामान्य गुणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनात त्यांना आदरयुक्त स्थान आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांनी अंगिकारलेले तत्त्व सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाचा या वेळी सन्मान होताना उपस्थितांचा ऊर अभिमानाने भरून आला होता.
रामशेठ यांच्या शब्दात ताकद -खासदार श्रीनिवास पाटील
रामशेठ ठाकूर हे माझे मित्र आहेत. प्रत्येक व्यक्ती शेवटी रिकाम्या हाती जातो, पण रामशेठ यांनी एवढे कर्तृत्वाने कार्य केले आहे की, ते भरल्या हातानेच राहणार आहेत. रामशेठ यांच्या शब्दात ताकद आहे. रामशेठ म्हणजे देणगीची खैरात आहे, त्यामुळे रामशेठला कशाचीही भीती नाही. आम्हाला कोटीवर किती शून्य असतात ते लिहिता येत नाही, पण रामशेठ कोटीच्या कोटी देणगी देतात, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगतानाच ‘जय हो राम’ अशी गर्जना केली आणि या माझ्या मित्राचे वैभव आणि दानशूरपणाने डोळ्यांत आनंदाश्रू वाहत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे एटीएम -चेअरमन डॉ. अनिल पाटील
रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज आहे. या महाविद्यालयात रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण घेतले आणि ते कर्तृत्वाने मोठे झाले. आता त्यांच्या नावाने येथे भवन उभारले आहे याचा आम्हा सर्व रयतसेवकांना अत्यानंद आहे. येथील प्रत्येक वास्तू पुण्यवान व्यक्तीची आहे. त्यामुळे रामशेठ ठाकूर यांच्या नावाचे भवन भावी पिढीचे भविष्य घडविणारी वास्तू आहे. रामशेठ यांनी संस्थेच्या जडणघडणीत भरभरून दिले आहे. प्रत्येक हाकेला साद दिली. पवारसाहेब आणि रामशेठ ठाकूरसाहेब आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नसून लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे एटीएम आहेत, असे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले.
रामचा रामशेठ ‘रयत’मुळे -लोकनेते रामशेठ ठाकूर
आपल्या मनोगतात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे ज्यांनी आत्मसात केले तो व्यक्ती मोठा झाला आहे. रयत शिक्षण संस्था माझे घर आहे. कर्मवीर अण्णांची कृपादृष्टी झाली नसती तर आम्ही सुशिक्षित झालो नसतो. आम्हाला पैलू पाडण्याचे काम अण्णांनी केले आहे. म्हणून रामचा रामशेठ ‘रयत’मुळे झाला आहे. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रयत शिक्षण संस्थेत काम करीत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे सातत्याने संस्थेला मार्गदर्शन लाभते. मी त्यांच्यासोबत राजकारणात गेलो नाही, पण त्यांचा शिक्षण क्षेत्राचा आदर्श घेऊन वाटचाल केली. अण्णांचा आशीर्वाद आणि पवारसाहेबांची साथ यामुळे शिक्षण क्षेत्रात वाटचाल सुरू आहे. अण्णांच्या आपुलकीने विशेष संस्कार घडले. त्यामुळे आपल्याकडे असलेला काहीतरी भाग समाजासाठी द्यावा, ही कायम इच्छा असते. रयत शिक्षण संस्थेचे ऋण फेडू तेवढे कमी आहे. आजचा समारंभ माझ्या आयुष्यातील मोजक्या पाच-दहा समारंभांपैकी एक आहे. ‘रयत’चे आपल्यावर अफाट उपकार आहेत. त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी यापुढेही आपले सहकार्य राहील.
कुंभोज विद्यालयासाठी देणगी
रयत शिक्षण संस्थेच्या कुंभोज येथील विद्यालयाच्या विकासासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एक कोटी 25 लाख रुपये व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी एक कोटी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. ती या सोहळ्यात धनादेशाद्वारे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी संस्थेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर व शकुंतला ठाकूर यांचा टाळ्यांच्या कडकडाटात हृद्य सत्कार करण्यात आला.
असे आहे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’
‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभे राहिले आहे. हे भव्य भवन 36 हजार स्क्वेअर फूटचे असून पार्किंग व चार मजली आहे. यामध्ये 28 खोल्या आहेत, तसेच प्रशस्त सभागृह, रिसर्च सेंटर, पदव्युत्तर विभाग, मीडिया अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट स्टुडिओ, कॉम्प्युटर लॅब आहे. त्याचबरोबर फायर सिस्टीम, लिफ्ट अशा विविध आधुनिक सुविधा या भवनात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह  प्राध्यापकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply