खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाच्या भानगडीत पडू नका, जागृत रहा तरच, सायबर गुन्हे आटोक्यात येतील, असे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी केले.
खोपोली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून 2 जानेवारीपासून रेझींग डे सप्ताह सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यासाठी जनता विद्यालयाच्या रामशेठ ठाकूर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक शिरीष पवार मार्गदर्शन करीत होते. सायबर गुन्हेगारीविषयी पवार यांनी यावेळी माहिती दिली.
अनोळखी माणसाला ओटीपी नंबर देवू नका, कोणताही मेसेज खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका, असा सल्ला पवार यांनी दिला. यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून कसे फसविले जाते, यासंदर्भातील चित्रफीत दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुखसर यांनी केले. केटीएसपी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील, सदस्य दिलीप पोरवाल, केएमसी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजू अभाणी, जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव, शेतकरी संघटनेचे शांताराम पाटील, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षिका या वेळी उपस्थित होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper