Breaking News

उरणकर चाखताहेत रानमेव्याची लज्जत

उरण : बातमीदार

उन्हाळ्यात खवय्यांसाठी रानमेवा तोंडाला पाणी आणतो. मार्च-एप्रिल सुरू झाला की रानमेवा बाजारात दिसू लागतो. मे महिन्यातही सर्वगुणी जांभूळ, करवंद, कच्च्या काजूच्या बिया, पांढरेशुभ्र जाम, कोकम, आवळा, गावठी चुखायाचे आंबे अशा प्रकारचा रानमेवा सध्या उरण बाजारात दाखल झाला आहे व ते खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी दिसत आहे. रानमेवा म्हणजे कोणत्याही प्रकारचे केमिकल मिश्रित नाही, निसर्गाने दिलेली देणगी होय. रानमेवा हा उन्हाच्या कहिलीपासून दिलासा देणारा आहे. रानमेवा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते, परंतु पूर्वीपेक्षा आता रानमेवा कमी उपलब्ध होऊ लागला आहे. त्याचे कारण जंगले कमी झालेली आहेत व त्या ठिकाणी कन्टेनर यार्ड झाले आहेत. त्यामुळे रानमेवा कमी मिळू लागला आहे. आदिवासी लोकांना रानमेवा जमा करण्यासाठी जंगलात दूर जावे लागते. रानमेवा दुर्मिळ झाल्याने रानमेवा महाग मिळू लागला आहे.

रानमेवा पेण, अलिबाग, कोप्रोली, मोठीजुई, चिरनेर, दाउरनगर आदी ठिकाणाहून बाजारात विकावयास येतो. राजपाल नाका, गांधी चौक, महाराष्ट्र स्वीटजवळ, सिटीझन हायस्कूलजवळ, आनंदनगर कॉर्नर, बाजारपेठ आदी ठिकाणी रानमेवा विकावयास आला आहे. आदिवासी लोकांना रानमेवा डोंगरावरून आणतांना फारच कष्ट पडतात. रानमेवा बाजारात विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून घरासाठी सामान, सामग्री खरेदी करतात. रानमेवा हा आदिवासी यांच्यासाठी एक वरदानच आहे. उरण तालुक्यातील अतिदुर्गम भागात आदिवासी जमात रानमेवा गोळा करतात, ते बाजारात विकतात, त्यामुळे हे त्यांच्या उपजीविकेचे साधन झाले आहे. त्यांना हंगामी रोजगार उपलब्ध झाली आहे.

काळी बोरं, टपोरी जांभळं ही मधुमेही रुग्णांना फारच उपयोगी व औषधी असल्याने जांभूळ खरेदीवर विशेष भर आहे. जांभूळ एक किलो 160 रुपये, गावठी चुखायाचे आंबे 200 रुपये डझन, अशा भावाने विकली जात आहेत. करवंदे एक वाटा 10 रुपये, पांढरेजाम 25 डझन, तर ताडगोळे 100 ते 120 डझन या भावाने विकले जात आहेत, असे पेणहून आलेल्या लक्ष्मीबाई यांनी सांगितले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply