कर्जत ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर 2019मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 जागांकरिता आरक्षण काढण्यात आले आहे. नेरळमध्ये 10 आदिवासी वाड्या असून त्या वाड्या ज्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी तीन जागांपैकी एकही जागेवर आदिवासी समाजासाठी आरक्षण नाही. दरम्यान, यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 2019 अखेरीस नेरळ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नगरपरिषद व्हावी, म्हणून नेरळ ग्रामपंचायत आणि ग्रामसभेने ठराव दिले असून देखील गेली दोन वर्षे सातत्याने मागणी करूनदेखील नेरळचे शहरात रुपांतर होत नसल्याने नेरळकर नाराज आहेत. असे असताना देखील ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याने नाराज असूनदेखील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आरक्षण सोडतीसाठी हजर होते. आरक्षण सोडत काढण्यासाठी कर्जत तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार संजय भालेराव आणि नेरळचे महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप तसेच तलाठी गायकवाड उपस्थित होते. 2014मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नेरळ ग्रामपंचायतीसाठी जे प्रभाग होते, तेच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये आदिवासी विभाग असलेल्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी आरक्षण नाही. आदिवासी समाजासाठी तीन जागांचे आरक्षण आहे. पण त्या जागा आता आदिवासी समाजाचे अल्प मतदार असलेल्या प्रभाग चार, पाच, सहामध्ये विभागले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper