कर्जत ः प्रतिनिधी
हल्लीची पिढी विचार करीत नाहीत असे अनेकांचे मत आहे ते मला मान्य नाही. ही मुले फार हुशार व जिज्ञासू आहेत. जे चांगले असते तेच ते वाचतात. हल्लीच्या दिवसांत मुलांचे कौतुक म्हणजे त्यांच्या हातावर स्टार काढले जातात. आपल्या वेळी हे नव्हते. आईचे नाव आपल्या प्रमाणपत्रावर आणि गुणपत्रिकेवर असावे यासाठी मी प्रयत्न केले. सुरुवातीला अयशस्वी झाले, परंतु जिद्द सोडली नाही आणि यश आले. आईवडिलांचा आदर करणारा मुलगा असो की मुलगी ते जीवनात यशस्वी होतातच. भारतीय संस्कृती समाजधारणेचा विचार व उदात्त संस्कारावर उभी आहे. त्याची प्रचिती मला येथे आली, असे प्रतिपादन नुमबी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी येथे केले.
कर्जत शहरातील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथ संग्रहालयाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या प्रांगणात आयोजित केले होते. डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी न्यायवैद्यकशास्त्र तज्ञ डॉ. वसुधा आपटे, शतक महोत्सव समिती अध्यक्ष डॉ. विजया पेठे, उपाध्यक्ष दिलीप गडकरी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी, समिती अध्यक्ष दीपक बेहरे, सचिव सुचेता जोगळेकर, बाळकृष्ण रेडकर, पद्माकर गांगल, अनिल जोशी, सुधाकर निमकर, ग्रंथपाल रामदास गायकवाड आदी उपस्थित होते.
कु. मनाली जोशी यांनी गणेशवंदना सादर केली. डॉ. पेठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बेहेरे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा चढता आलेख सादर केला. जोगळेकर यांनी शतक महोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची संपूर्ण माहिती सांगितली. या वेळी संस्थेचा रौप्य महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि आजचा शतक महोत्सव पाहणारे 95 वर्षांचे साक्षीदार संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेदेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच अनंता पवार, वसंत जोशी, प्रा. अजित पाटील, प्रा. नितीन आरेकर यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वसुधा आंधळकर यांनी संस्थेला उद्देशून तयार केलेले पत्र सादर केले. आरेकर, पवार यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन दिनेश आडावदकर यांनी तर आभार प्रदर्शन रामदास गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, मोहन ठोसर, दत्ताराम खंडागळे, मृदुला गडणीस, अनुपमा कुलकर्णी, गणेश वैद्य, श्रीराम पुरोहित, राजाभाऊ काळे, सदानंद जोशी, धनंजय बेडेकर, गायत्री परांजपे, शुभदा दळवी, अच्युत कोडगिरे, सुभाष नातू, राजेश थत्ते, योगिता साखरे, अनिल आंधळकर, संदीप भोसले, वनिता गायकवाड आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper