नागपूर ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करीत आहेत. आपल्या बाजूला बसलेले पक्ष कसे खूश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे, मात्र शेतकर्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 19) स्पष्ट केले.
शेतकर्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही फडणवीस यांनी केला. आपल्या बाजूला बसलेले पक्ष कसे खूश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल याची काळजी मुख्यमंत्री घेताहेत, परंतु शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यांनी शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. राज्यपालांच्या अभिभाषणावर जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले तसे भाषण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही. ते सभागृहात नाही तर शिवाजी पार्कातील रॅलीत भाषण करत आहेत असे वाटत होते. हे शेतकर्यांचा अपमान करणारे सरकार आहे. पहिल्याच अधिवेशनात आपल्या शब्दांवरून सरकार पलटले आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper