Breaking News

इतिहासातील गोष्टी प्रेरणादायी असल्याने निलाताईंनी लिहिलेल्या पुस्तकाचे महत्त्व मोठे

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी

आज सर्वत्र झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण होत असले तरी, त्या भागाच्या जुन्या आठवणी व त्याचा इतिहास आपण विसरु शकत नाही, कारण या इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतात, त्यामुळे पुढील पिढ्यांसाठीही तो इतिहास फार महत्वाचा असतो. निला उपाध्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे महत्वाचे म्हणूनच मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. दर्पण प्रकाशनतर्फे ज्येष्ठ पत्रकार व लेखिका निला उपाध्ये यांनी लिहिलेल्या ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास व आगरी समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि. 22) मुंबई पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी रामशेठ ठाकूर बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोकण इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जगन्नाथ पाटील अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, राहूल चेंबुरकर, मुंबई विद्यापीठाच्या प्रा. अलका मटकर उपस्थित होत्या. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निला उपाध्ये यांच्या संशोधन वृत्तीचा व लेखन शैलीचा गौरव करुन वयाच्या 74व्या वर्षीही त्यांच्या सुरु असलेल्या धडपडीचे कौतुक केले. ते म्हणाले की, या पुस्तकात नुसत्या चुनाभट्यांचा इतिहासच नव्हे तर आगरी समाजाची बरीच माहिती देण्यात आली आहे. आणि निला ताईंनी केलेले संशोधन इतिहासाचे दाखले देत, परीश्रम पुर्वक केले असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन खास सन्मान केला. प्रारंभी निला उपाध्ये यांनी या पुस्तकामागील भुमिका विशद केली व हे पुस्तक आपली आजी कै. सीताबाई रामचंद्र गायकर यांना अर्पण केले असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, मी संशोधक नाही पण आजीच्या प्रेरणेने चुनाभट्टीत आमच्या कुटुंबाला जी माया मिळाली. त्यातून उत्तराई होण्यासाठी आणि चुनाभट्टीच्या आकर्षण व प्रेमामुळे  माझ्या हातून हे लिखाण झाले. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी पुस्तकातील संदर्भ देत मुंबईच्या इतिहासाबाबत माहिती देऊन अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, निलाताईंच्या पुस्तकामुळे इतर भागातही चुनाभट्ट्या आहेत हे मला समजले. यातून आगरी बांधवांनी निर्माण केलेल्या चुन्यावर मुंबईत ब्रिटीशांनी या हेरीटेज इमारती बांधल्या. हे लेखिकेने संशोधनातून सिद्ध केले. जगन्नाथ पाटील यांनी काही वेळ आगरी भाषेतून भाषण करुन आगरी बोली भाषेत किती गोडवा आहे, हे दाखवून दिले. समारंभाचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी यावेळी मुंबईच्या इतिहासाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, आपण इतिहास विसरुन जात आहोत पण व्यक्ती स्थळांच्या इतिहासाबरोबरच प्राण्यांचा इतिहासही आपल्याला प्रेरणा देणारा आहे. हे समजून घेतले पाहिजे हत्ती, घोडा बैल, हे आपल्या संस्कृतीचे  प्रतिक आहे. ही इतिहास सांगतो. या वेळी अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, राहूल चेंबूरकर, प्रा. अलक मटकर यांचीही भाषणे झाली. ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply