
उरण : प्रतिनिधी
मार्च महिन्यातील वाढत्या उष्णतेने सापांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला असून, या वन्यजीवांना जंगली परिसरात आत्ता संरक्षण राहिले नसून, जंगलाच्या ठिकाणी बेसुमारपणे लावण्यात येणार वणवे या वन्यजीवांचे जीवन उद्धवस्त करीत असल्याने त्यांचे उदर निर्वाहासाठी लागणारे भक्ष नष्ट होऊ लागल्याने सापांनी आपला मोर्चा ग्रामीण परिसरातील गावांकडील मानवी वस्तीकडे वळविला आहे. पावसाळ्यात पिल्लांना जन्म देणार्या सापांचा मार्च प्रजननाचा कालावधी असल्याने एकमेकांच्या समन्वयात येणार्या सापांनी उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात एकाच ठिकाणाच्या घराजवळ व बाजूच्या ठिकाणी तीन दिवसात पाच आढळल्याने परिसरातील महिला व लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, या कलंबुसरे गावात आढळून आलेल्या सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलाच्या ठिकाणी सोडविण्याचे काम वन्यजीव मित्र महेश भोईर व शिवकुमार भेंडे हे करीत असून, सापांबाबत गैरसमज दूर करून साप शेतकर्याचा कसा मित्र आहे, याची जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. गावागावातील नागरिक, महिला व बालकांची सापांबाबतची भिती दूर करण्याचे काम करीत आहेत. सातत्याने कोणत्याही क्षणी परिसरात साप आढळून आल्यास त्याला पकडून सुरक्षित जंगलाच्या ठिकाणी पोहोचवून सोडण्याचे कार्य करीत असल्याने सापांबाबतचा गैरसमज दूर होण्यास मदत होत असून, यापूर्वी साप आढळल्यास कोणालाही दंश करेल या भितीने त्या सापाला काठी, दगडाने ठेचून ठार मारण्याची प्रथा बंद झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper