
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणात जून अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे, मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून 3 मेच्या लॉकडाऊननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उपअभियंता रंजित बिरंजे यांनी दिली आहे. उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई हे एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारितील रानसई धरणातूनच उरणमधील 34पैकी काही ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा होतो. रानसई धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने डिसेंबर 2019पासूनच सिडकोकडून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबरपासून सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज पाच एमएलडी पाणी घेतले जात आहे. रानसई धरणात जूनपर्यंत नागरिकांना पुरेल इतका पाणीसाठा आहे, मात्र उन्हाच्या तडाख्याने रानसई धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. त्यामुळे पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय पाऊस लांबणीवर पडल्यास उरणच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच सिडकोकडून घेण्यात येणारे पाच एमएलडी पाणीही कमी पडत असल्याने आणखी दोन असे एकूण सात एमएलडी पाणी वाढवून देण्याची व्यवस्था उरण एमआयडीसीकडून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप सिडको अधिकार्यांबरोबर चर्चा सुरू आहे, मात्र सिडकोने पाचवरून सात एमएलडी पाणीपुरवठा करण्यास होकार दर्शविलेला नाही. त्यामुळे उरणकरांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी खबरदारीची उपाययोजना अमलात आणण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper